राज्यात आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार..!! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंची माहिती

310 Views

 

मुंबई : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असल्याने आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 

राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची विनंती केली. तसेच पाचवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले नसले तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये येऊन बसत आहेत. त्यांना शिकवलेदेखील जात आहे.

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा आग्रह बहुतेक सर्वच सीईओंनी धरला. पाचवी ते बारावी सुरू झाल्यापासून तेथे कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करतानाही वेगळ्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. टास्क फोर्सशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध संस्थाचालकांशी मी लवकरच चर्चा करणार आहे. बैठकीला शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या.

Related posts