गोंदिया. जिल्ह्यात 43 कृषि केंद्राचे परवाने निलंबित

1,864 Views

गोंदिया, दि.21 :- जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बि-बियाणे, खते व किटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषि विभागाने 9 भरारी पथक स्थापन केली आहेत. भरारी पथकामार्फत अचानक तपासणीसाठी धडक मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे.

        कृषि केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिष्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, मुदतबाह्य किटकनाशक साठा विक्रीसाठी ठेवणे आदी कारणांमुळे 43 निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

त्यामध्ये गोंदिया-07, सडक अर्जुनी-20, अर्जुनी मोरगाव-11, सालेकसा-03, गोरेगाव-2 (बियाणे-3, रासायनिक खते-36, किटकनाशक-4) एकूण 43 कृषि निविष्ठा परवाने समावेश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी दिली.

         कृषि सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकाची खरेदी करावी. खरेदी करतांना कृषि निविष्ठा केंद्राकडून निविष्ठा खरेदीची पक्के बिले घ्यावे, त्यावरील नमुद एमआरपी प्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच एमआरपी पेक्षा जास्त दराने मालाची विक्री होत असल्यास कृषि विभागाकडे तक्रार करावी.

त्याची तात्काळ दखल घेऊन बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983, खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955, किटकनाशक कायदा 1968, किटकनाशक नियम 1971 नुसार संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल. असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.

Related posts