गोंदिया: आपत्ती व्यवस्थापन विभागाची कामगिरी मोलाची- जिल्हाधिकारी नयना गुंडे

236 Views

 

सन्मानपत्र देऊन शोध व बचाव पथकाचे गौरव

गोंदिया:(दि.24) जिल्ह्यात मानसून कालावधीत वेगवेगळ्या घटनांमध्ये तात्काळ प्रतिसाद देऊन जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व शोध बचाव पथकाने मोलाची कामगिरी केली असून जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आज दि.24 सप्टेंबर रोजी सन्मानपत्र देऊन आपत्ती व्यवस्थापन विभाग व शोध बचाव पथकाचे गौरव केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, दीपक परिहार, आकाश चव्हाण, रूपचंद नाकाडे, सुपचंद लिल्हारे तसेच शोध व बचाव पथकाचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

या वर्षी जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांच्या दुर्देवी मृत्यू झाला असून शोध व बचाव पथकाच्या मार्फत त्यांचे मृतदेह रेस्क्यू करून काढण्यात आले. आमगाव तालुक्यातील मुंडीपार या गावात 7 सप्टेंबर रोजी चार युवकांचा बाघनदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची अप्रिय घटना घडली असून जिल्हा शोध व बचाव पथकाच्या मार्फत या चारही युवकांचे मृतदेह शोधण्याचे कार्य करण्यात आले. जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर यांचे मार्गदर्शन घेऊन जिल्ह्यातील शोध बचाव पथकाची क्षमता बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया तर्फे आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी यावेळी सांगितले.

आपत्ती दरम्यान प्रशासनान व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवावे- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

पूर परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन नेहमीच सज्ज आहे. प्रशासन व नागरिक हे समाजातील घटकाचे दोन बाजू आहेत, अश्या परिस्थितीत आपत्ती दरम्यान प्रशासनान व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे. सद्यस्थितीत धरण, जलाशय इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढत असून केव्हाही धरणाचे वक्र द्वार उघडण्यात येऊ शकतात व त्यामुळे पाण्याचा विसर्गामुळे नदी काठावरील गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्व संबंधित नागरिकांनी विशेष दक्षता घेवून सजग नागरिक सुरक्षित नागरिक या सूत्राचे पालन करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांना गुंडे यांनी केले आहे.

सेल्फीचे मोह टाळावे…

सद्यस्थितीत धरण, जलाशय, तलाव, नदी, नाले इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढली असून अशा ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच या ठिकाणी सेल्फीचे मोह टाळावे व पाण्यात बोटिंग करताना लाइफ जॅकेटचा वापर करावा तसेच बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी बसू नये. पुलाच्या वरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये तसेच या दरम्यान विशेष खबरदारी काय घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सहाय्यक जिल्हाधिकारी अनमोल सागर यांनी केली शोध व बचाव साहित्यांची पाहणी

सद्यस्थितीत राज्यात पुराचा तडाखा सुरू असून राज्यातील अनेक जिल्हे पूर प्रभावित आहेत. जिल्ह्यात मान्सून कालावधीत पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन ताकदीने सज्ज असून शोध व बचाव साहित्यांची पाहणी करण्याकरिता सहाय्यक जिल्हाधिकारी अनमोल सागर यांनी आज दि.24 सप्टेंबर रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपलब्ध असलेल्या शोध व बचाव साहित्यांची पाहणी केली.

जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची क्षमता बांधणी पाहण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी सागर यांनी पूरपरिस्थिती दरम्यान शोध व बचाव कामात उपयोगी रबर/फायबर बोटी, लाइफ जॉकेट, लाइफ बॉय, इमरजेंसी लाईट, OBM मशीन, टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले फ्लोटिंग डिवाइस, सर्चलाईट इत्यादी सर्व साहित्यांचे निरीक्षण करून इत्यंभूत माहिती घेतली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थिती दरम्यान करण्यात येणारी कामे, नागरिकांना सुरक्षित हलविण्याकरिता करण्यात येणारी उपाय योजना, जिल्हा नियंत्रण कक्षाचे संचालन, मानक कार्यपद्धती (SOP) व पूर दरम्यान संबंधित सर्व विभागांचे समन्वय इत्यादी बाबत सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी यावेळेस संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे कौतुक केले.

Related posts