स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, तलाठ्यांमार्फत मिळणार घरपोच सात बारह… 2 ऑक्टोबर पासून मोहिमेस सुरुवात

253 Views

 

गोंदिया,दि.22 : भारत हा कृषि प्रधान देश असून देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. तसेच स्वराज्याच्या संकल्पनेत संपूर्ण स्वातंत्र्यामध्ये शेती व्यवसाय हा देशाची आधारशिला आहे. देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त प्रत्येक खातेदारास तलाठ्यांमार्फत घरोघरी जाऊन मोफत 7/12 देण्याच्या उद्देशाने 2 ऑक्टोबर 2021 पासून विशेष मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार असून सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा सभा घेऊन सदर मोहिमेत करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक निर्देश दिले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमीत्त डिजीटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमी अंतर्गत विकसीत करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक गा.न.नं.7/12 अद्यावत उताऱ्याची प्रती जिल्ह्यात संबंधीत तलाठ्यामार्फत शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन मोफत उपलब्ध करुन देणेबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावर सुरु करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या आर्थिक उभारणीतील शेतकऱ्यांचे योगदान विचारात घेऊन 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून सदर मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येईल. या मोहिमेअंतर्गत डिजीटल 7/12 सर्व संबंधितांना समजण्यासाठी अधिक सोपा करण्यात आलेला आहे. सदर मोहीम राबविण्यासाठी जिल्हास्तरावर कालबध्द कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. त्यानुसार 2 ऑक्टोबर रोजी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना डिजीटल 7/12 वाटप करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे सदर कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी युध्दपातळीवर महसूल विभागातर्फे कार्यवाही करण्यात येत आहे. अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली आहे.

Related posts