गोंदिया: दहा वर्ष पूर्ण झालेली आधार कार्ड अद्ययावत करावे – किशोर बागडे

964 Views

           गोंदिया, दि.1 : जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आधार कार्ड काढलेले आहे. मात्र ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून मागील दहा वर्षात आधार कार्डचा वापर कोठेही केला नसेल़, केवायसी केले नसेल अशा व्यक्तीनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा हे कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या घडीला प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांकाची मागणी केली जाते. आधार क्रमांक नसेल तर ते काम पूर्ण होत नाही. आधार कार्ड महत्त्वाचा पुरावा झाला आहे. त्यामुळे आपले आधार कार्ड अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक किशोर बागडे यांनी केले आहे.

बोटांचे ठसे पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे

         आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे की पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याचीही शक्यता असते. आधार कार्डला सबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदणीचे आद्ययावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे, त्यांनी आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन केवायसी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने डेमोग्राफिक अपडेट साठी (नाव, पत्ता, जन्म दिनांक. लिंग, मोबाईल क्र.,ई-मेल) इत्यादी साठी 50 रू. तसेच बायोमेट्रीक साठी अपडेट (हाताचे बोटाचे ठसे, डोळ्यातील रेटीना स्कॅन) साठी 100 रू इतके शुल्क निर्धारीत केलेले आहे.

पहिल्यांदाच आधार काढताय

       आपण पहिल्यांदाच आधार काढत असला तर ते पूर्णतः मोफत असते. त्यासाठी कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जात नाही. वास्तविकत: आतापर्यत जवळपास सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड काढलेले आहे. पहिल्यांदाच आधार काढण्याच्या प्रौढ व्यक्ती क्वचितच सापडतील.

आधार अपडेट कोठे कराल

        सीएससी सेंटर, बँक इंडिया पोस्ट या ठिकाणी जाऊन नागरिक आधार अपडेट करू शकतील. अनेक ठिकाणी अपडेशन करण्यासाठीची सुविधा उपलब्ध असल्याने सर्व नागरिक या संधीचा फायदा घेवू शकतात.

बालकांचे आधार कोठे काढाल

        महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत 0 ते 5 वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. ही नोंदणी नि:शुल्क आहे. बालकांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये 30 संच प्राप्त झाले आहे. त्यामुळे बालकांची नोंदणी वेगाने होत आहे.

        आधार कार्ड बनवून दहा वर्षे झाली असतील. या दहा वर्षाच्या कालावधीत एकदाही आधार कार्डचा वापर कोठेही केला नसेल अशा व्यक्तीनी ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपडेट करून घ्यावीत त्यामुळे त्यांना आधार मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होतील व त्यांना शासकिय योजनांचा लाभ घेता येतील, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related posts