गोंदिया: अन्यायाच्या विरोधात इर्री येथील शेतकऱ्याचे धरणे आंदोलन, न्यायाची मागणी

123 Views

 

गोंदिया ता-9 आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध दाद मिळावी व दोषींवर कारवाई व्हावी म्हणून शासन दरबारी अनेक विनंती अर्ज देऊनही न्याय मिळत नसल्याने अखेर सोमवार (ता. 9) पासून गोंदिया तालुक्यातील इर्री येथील शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासमवेत झोपडी जमीनदोस्त केलेल्या स्थळी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.

येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांच्या स्वमालकीच्या शेतातील झोपडी ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणाचा ठपका ठेवित मागच्या मार्च महिन्यात जमीनदोस्त केली. यात सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्यात सर्व जीवनावश्यक वस्तू देखील ग्रामपंचायत प्रशासनाने जप्ती केल्या. व सदर जागा मोकळी केली. परंतु आता या मोकळ्या झालेल्या जागेवर या कारवाईचे तक्रारदार हिरालाल दाजी ठकरेले हेच अतिक्रमण करीत असून ग्रामपंचायत प्रशासन त्यास सर्वस्वी मदत करीत असल्याचा आरोप अन्यायग्रस्त शेतकऱ्याने लावला आहे. या प्रकरणाची सुद्धा शासन दरबारी तक्रार करण्यात आली. परंतु तक्रार करूनही जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अखेर शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांनी आपल्या कुटुंबासमवेत मोकळ्या झालेल्या जागेवर आंदोलनाचा पवित्रा हातात घेत धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे.

सदर आंदोलनास ग्रामपंचायत सदस्य प्रांताबाई मगनलाल ढेकवार, उर्मिलाबाई शामलाल उपवंशी, कैलास हरीचंद चौधरी, चैनलाल दमाहे तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपला पाठिंबा दिला असून सदर शेतकऱ्याला तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी जिल्हा जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

एका शेतकऱ्यांवर झालेला अन्याय जिल्हा प्रशासन किती दिवसात दूर करतो यांकडे इर्री वासीयांचे लक्ष लागले आहे.

 आमचे आंदोलन न्यायासाठी- शेतकरी ओमकार दमाहे… 
आमचे आंदोलन हे न्यायासाठी आहे आणि जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार.

Related posts